धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून जेव्हा काही सकारात्मक घडतं, तेव्हाच विरोधकांना पोटशूळ का उठतो? हा खरा प्रश्न आहे. कौडगाव  मध्ये टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाले आहे. हजारो हातांना रोजगाराची संधी त्यामुळे मिळणार आहे. हे लक्षात येताच जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी लगेच पत्रकार परिषद घेत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार आणि आमदार करीत आहेत. बिनबुडाच्या आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या या जोडीच्या पोटदुखीचे खरे कारण जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे आहेत. “नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीप्रमाणे यांचे वर्तन आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण विकासकामे मोठ्या वेगाने मार्गी लागत आहेत. त्यामुळेच यांची अस्वस्थता वाढली आहे. स्वतः सत्तेत असताना ज्यांना जिल्ह्यासाठी काहीच करता आले नाही किंवा ज्यांनी जाणीवपूर्वक काहीच केल नाही ते आज कांगावा करीत आहेत. ते सत्तेत असताना  मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, पालकमंत्री त्यांच्याच पक्षाचे होते तरीदेखील कौडगाव  बाबत यांनी साधी बैठकही घेतली नाही. स्वतःच्या मतदारसंघात असलेल्या एमआयडीसीसाठी एखादी बैठक घेण्याचे शहाणपण ज्यांचेकडे नाही तेच महाभाग आज मोठा आव आणत आहेत.

आज आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून रेल्वेसाठी निधी मंजूर केला, शेतकऱ्यांना थेट पैसे मिळवून दिले, कौडगाव  मध्ये टेक्निकल टेक्सटाईल सारखा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लावला, कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयासाठी तब्बल 1865 कोटी उपलब्ध केले. याचाच यांना त्रास होतो आहे. कोणतेही चांगले काम झाले की, विकासाच्या गोष्टी मार्गी लागल्या की लगेच यांना बिनबुडाचे आरोप करायची खाज सुटते. ज्यांच्याकडे स्वतःची अकार्यक्षमता नसते तेच असा बोभाट करीत सुटतात.

वास्तविकता अशी आहे की, यांच्याकडे ना दृष्टिकोन आहे, ना दूरदृष्टी. फक्त टीका करणे, दिशाभूल करणे, आणि पदांचा वापर स्वतःच्या हितासाठी करणे हेच यांचे कार्य आहे. जनतेला आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो की, विकास ही आमची प्राथमिकता आहे, आरोप करणे नव्हे. काम करून दाखवणे हेच आमचं ब्रीद आहे, पत्रकार परिषद घेऊन आरडाओरड करणं नव्हे.

ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.राणा दादांच्या पुढाकाराने यात कारवाई झाली आहे. पोलीस योग्यरित्या काम करत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर न्यायालय कारवाई करेल मात्र हे वारंवार याबाबत पत्रकार परिषद घेऊन गंभीर सामजिक प्रश्नांचे राजकारण करत आहेत हे दुर्दैवी आहे. विरोधकांनी हे पोरकट धंदे थांबवावेत आणि जर जनतेच्या हिताची काळजी असेल, तर पदाचा उपयोग जनहितासाठी करावा, आप्तस्वकीयांच्या फायद्यासाठी नव्हे. 

एका कुटुंबाचा सतत विरोध करणे आणि त्यालाच आपले सर्वोत्कृष्ट काम म्हणणे म्हणजे विकास नव्हे. सर्वसामान्य नागरिकांनी तुम्हाला जनहिताची कामे करण्यासाठी निवडून दिलेले आहे. केवळ टीका टिप्पणी आणि एका कुटुंबाबद्दल आकस बाळगण्यासाठी नाही. याला विकासाचे राजकारण म्हणत नाहीत विकासाच्या मुद्द्यावर विकासात्मक दृष्टीनेच बोलण्याची धमक दाखवा.आतापर्यंत तुम्ही कांही केलं नाही इथून पुढे तरी करा. बिनबुडाच्या गावगपा मारण्यापेक्षा  लोकांनी ज्या कामासाठी निवडून दिले आहे त्या विकास कामांवर जरा प्राधान्याने लक्ष द्या.

 
Top