धाराशिव (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वाटणी पत्रकाच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रातील शेतकऱ्या साठी मोठा हिताचा असल्याचे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी व्यक्त केले आहे.
या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले आहे की, राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे हजारो रुपये वाचण्यास मदत होणार आहे राज्यातील तमाम शेतकरी वर्गात या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे महाराष्ट्रात ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीतील जमीनची वाटणी करावयाची असल्यास त्याला खूप मोठ्या प्रमाणात नोंदणी शुल्क राज्य सरकारला द्यावे लागत होते पण या निर्णयामुळे एकत्र कुटुंब पद्धतीतील वाटणी पत्र मोफत होणार आहे ही जमीन कुटुंबाअंतर्गत वाटणी करावी लागत असतेच पण शेतकऱ्यासमोर आर्थिक अडचणी असल्यामुळे जमीन वाटणी पत्र करणे अवघड जात होते पण या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना होत असल्याकारणाने शेतकरी आनंदी झाला आहे. त्याचबरोबर कुटुंबात असलेले वाद ही यामुळे थांबणार आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबददल राज्याचे महसुल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्य सरकारचे कोळगे यांनी अभिनंदन केले आहे.