धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजपच्या ‘संकल्प ते सिद्धी' अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सलग दुसऱ्या रविवारीही ‘जनता दरबार' उपक्रम राबवण्यात आला. 22 जून रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी जनता दरबार आयोजित करण्यात आले. या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला.
असंख्य तक्रारी लेखी व तोंडी स्वरूपात मांडण्यात आल्या. त्यातील अनेक तक्रारींचे निवारण दरबारातच करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे लाभले होते. त्यांच्या सूचनांनुसार आणि भाजपा जिल्हा संघटनाच्या नियोजनातून भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हाभरात जनता दरबारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नायगाव येथे दत्ताभाऊ साळुंखे यांच्या संयोजनात अस्मिता कांबळे यांच्या उपस्थितीत, आंबेजवळगा येथे अनिल भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली ॲड. दत्तात्रय देवळकर प्रमुख उपस्थित, पाडोळी येथे निलकंठ पाटील यांच्या संयोजनात नितीन काळे उपस्थित तसेच काक्रंबा येथे महादेव जाधव यांच्या आयोजकत्वाखाली ॲड. खंडेराव चौरे प्रमुख उपस्थित, तर इटकळ-केशेगाव येथे रंजना राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबार पार पडला. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातही, 15 जून रोजी जिल्हाभरात घेण्यात आलेल्या जनता दरबारांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या माध्यमातून नागरिक आणि पक्ष यांच्यातील थेट संपर्क, जनतेच्या अडचणींवर त्वरित कृती, आणि प्रशासनातील समन्वय अधिक सशक्त होत असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. ‘संकल्प ते सिद्धी' अभियानाचा उद्देश लोकाभिमुख शासन अनुभव देणे आहे. त्यातून गावपातळीवर थेट संवाद व निर्णय प्रक्रिया साध्य केली जात असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.