धाराशिव (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील आंबी येथील मंडळ अधिकारी यांच्याविरुद्ध महसूल कामकाजाचा राग मनात धरुन काही संबंध नसताना केवळ सूडबुद्धीने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. जर अशा पद्धतीने गुन्हे नोंद होत असतील तर भविष्यात मंडळ अधिकारी व तलाठी कोणतेही शासकीय कामकाज करताना विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी तो खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी धाराशिव जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.23 जून रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे उद्या दि. 24 जूनपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, भूम तालुक्यातील आंबी येथे मंडळ अधिकारी म्हणून दिनेश वैजिनाथ बहिरमल हे कार्यरत आहेत. आंबी येथील जमीन सर्व्हे नं./ गट नं. 87/ग मधील फेरफार क्र. 8124 मध्ये तक्रार दाखल झाल्यामुळे तक्रारी फेरफार प्रकरण दि. 24 एप्रिल 2024 रोजी मंडळ अधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी दाखल झाले होते. त्यामुळे मंडळ अधिकारी बहिरमल यांनी या प्रकरणात नियमानुसार वादी व प्रतिवादी यांना रीतसर नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्याची वाजवी व पुरेशी संधी देऊन दि. 9 जून रोजी प्रकरण निकालासाठी राखून ठेवले. या प्रकरणात मंडळ अधिकारी बहिरमल यांनी दि.11 जून रोजी निर्णय पारित केला व सदर फेरफार नोंदणीकृत खरेदी खताच्या आधारे मंजूर केला. या निकालाच्या नाराजीने प्रकरणाशी संबंधित असलेले प्रतिवादी प्रेमकुमार बाळासाहेब सरतापे यांच्या अधिकार पत्रानुसार कमलाबाई तुकाराम गायकवाड यांनी दि.13 एप्रिल 2025 प्रकरणातील पक्षकारांच्या सोबत कोणताही संबंध नसताना केवळ सुडबुद्धीने बहिरमल यांच्या विरुद्ध अंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 333, 115, 352, 351, 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र गुन्हा घडला त्यावेळी बहिरमल हे भूम येथील त्यांच्या राहत्या घरी होते. संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना माहिती असताना देखील त्यांनी कोणतीही चौकशी अथवा शहानिशा न करता निव्वळ तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल खळदकर, सरचिटणीस संजयकुमार माळी, सुहास जेवळीकर, महादेव गायकवाड, गजेंद्र पाटील, निळकंठ केदार, सचिन पवार, अश्विनी निंबाळकर, विनोद चुकेवाड, शरद दुधभाते, समाधान माळी, समाधान जावळे, जयराज कुलकर्णी, बालाजी बिराजदार, राजेश पडवळ, लक्ष्मण कांबळे, अश्विनी मारेकर, तेजस्विनी जगदाळे आदींसह जिल्हाभरातील मंडळ अधिकारी व तलाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top