धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्रामीण भागात बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, पुण्यश्लोक फाउंडेशन आणि धाराशिव बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 जून रोजी बेंबळी येथे भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण पट्ट्यात झाली असली तरी, तिचा दर्जा आणि उत्साह शहरातील मोठ्या स्पर्धांनाही मागे टाकणारा ठरला.

धाराशिव, सोलापूर, बार्शी, लातूर तसेच आसपासच्या परिसरातून आलेल्या 108 स्पर्धकांनी आपले बुद्धिबळ कौशल्य दाखवत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे या स्पर्धेत केवळ आंतरराष्ट्रीय गुणांक असलेले 21 खेळाडू नव्हे तर वयाच्या अवघ्या 5 वर्षांपासून ते 85 वर्षांपर्यंतचे बुद्धिबळप्रेमी सहभागी झाले होते. ही स्पर्धा वयोगटानुसार विविध गटांमध्ये विभागली गेली होती व प्रत्येक गटातील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

एकूण 32 विजेत्यांना सुमारे 35 हजाराची रोख पारितोषिके तसेच चषक व पदक देवून गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक फाउंडेशनचे धनंजय तानले, न्यायाधीश गावडे, हरिश्चंद्र गावडे, आबा गावडे, धाराशिव बुद्धीबळ संघटनेचे सचिव नंदकुमार सुरू ,नाना गावडे श्रीधर गावडे, दादा वाघे, जयंती उत्सव अध्यक्ष फोळणे, उपाध्यक्ष, संतोष लगस व समिती सदस्य यांच्या हस्ते ही पारितोषिके देण्यात आली.


विविध गटातील विजेते स्पर्धेक

विशाल पटवर्धन, अथर्व रेड्डी, नंदकुमार सुरु, जयकुमार तोडकरी, प्रवीर देशमुख, प्रज्वल वाघमारे, सान्वी गोर, मयुरेश स्वामी, सौंदर्या डिघोळे, डॉ. सुप्रिया भोसले, भगवान जाधव, नारायण झिरमिर, अथर्व गावडे, डॉ. अविनाश गावडे.  या भव्य आयोजनामुळे ग्रामीण पातळीवरही बुद्धिबळासारख्या बुद्धीला चालना देणाऱ्या खेळाची गोडी निर्माण झाली असून, पालक व खेळाडूंनी यासाठी आयोजकांचे विशेष कौतुक केले. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून श्रीकांत मंत्री यांनी अचूक आणि उत्कृष्ट पंचगिरी बजावली. तालुका सुद्धा नसलेल्या बेंबळी गावात झालेली ही बुद्धिबळ स्पर्धा आजही चर्चेचा विषय ठरली आहे.


 
Top