धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तेर परिसरातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील बीजप्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कृषिदूतांनी विशेष अभियान राबवले. या उपक्रमात शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया कशी करावी, त्याचे फायदे काय आहेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या शैक्षणिक उपक्रमाचे समन्वयक व्यवस्थापक हरि घाडगे, RAWE प्रमुख देवानंद शेटे, मृदा विज्ञान विषयाच्या प्रिया गोटे, अॅग्रोनॉमीचे प्रताप खोसे, पॅथोलॉजीचे प्रा. प्रविण माळी व कीटकशास्त्राचे अक्षय शिंदे हे होते. कृषिदूत प्रणय कोकाटे, जगदिश बसाटे, रमन घोरपडे, अशोक यादव, अमोल मायकर, साहित सांगुळे व संकेत सांगुळे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी सांगितले की, बीजप्रक्रिया न केल्यास बियाण्यांची उगमक्षमता कमी होते आणि उत्पादनात घट येते. योग्य बीजप्रक्रियेने बियाण्यांपासून होणाऱ्या तसेच जमिनीत असणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पीक सुरक्षित राहते.
तसेच, जमिनीत आढळणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. विशेषतः रसशोषक किडी आणि खोड माशी यांचा प्रादुर्भाव ३०-३५ दिवसांपर्यंत टाळता येतो. त्यामुळे कीडनाशकांवर होणारा खर्च वाचतो आणि उत्पादन खर्च कमी होतो. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास पिकाची सशक्त वाढ होते आणि उत्पादनात वाढ होते, असा विश्वास कृषिदूतांनी व्यक्त केला.