नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहराला कमीत कमी आठ दिवसाआड तरी सुरळीतपणे मुख्याधिकारी यांनी पाणी पुरवठा करावा. अन्यथा मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ शहर बंद करुन पालिकेला कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल. यावेळी आमच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती करावी, याची आम्ही तमा बाळगणार नाही, असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांनी नळदुर्ग पालिकेवर शहरवाशीयांच्या वतीने आयोजित केलेल्या गाढव मोर्चा मध्ये बोलताना दिला.
नळदुर्ग शहराला पंधरा दिवस झाला पाणी पुरवठा होत नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरवाशीयाना आज पंधरा दिवसात ही पाणी पुरवठा होत नाही. हे शहरवाशीयांचे दुर्दैव आहे. कारण धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आवस्था सध्या नळदुर्ग वाशीयांची झाली आहे. त्यामुळे नळदुर्ग वाशीयांनी मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ पालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा किल्ला गेट पासून चावडी चौकातून पालिकेवर नेण्यात आला. यावेळी पालिकेच्या दरवाजा समोर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी अमेय शेख, शिवाजी गायकवाड, ज्योतीबा येडगे, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पूदाले, सरदारसिंग ठाकूर, मनसेचे शहर प्रमुख प्रमोद कुलकर्णी, दगडू डुकरे, माजी नगरसेवक शरीफ शेख, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पूदाले, मुकुंद नाईक, अजहर जहागिरदार, माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी आदींची भाषणे झाली. यावेळी बहूसंख्य तरुण व नागरीक उपस्थीत होते. यानंतर पालिकेचे कर्मचारी रोमन यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान पालिकेवर मोर्चा आला आसताना ही पालिकेचे मुख्याधिकारी पालिकेत हजर नव्हते त्यामुळे अनेकांनी यावेळी मुख्याधिकारी यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.