नळदुर्ग (प्रतिनिधी)- शहरातील अतिक्रमण धारक नागरीकांना एएचपी योजने अंतर्गत घरकुलांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण धारकांनी लवकरात लवकर पालिकेत अर्ज सादर करावे असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले आहे. त्यामुळे आता शहरातील अतिक्रमण धारकांना ही घरकुलचा लाभ मिळणार आहे.
गेल्या सात आठ वर्षापासून नळदुर्ग शहरात पालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरीकांना त्यांना त्याचे हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेचा शहरातील शेकडो नागरीकांनी लाभ घेतला आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरीकांना त्यांच्या नावाने स्वत:ची जागा असल्याचे आठ अ ची नक्कल असणे गरजेचे होते त्यामुळे अनेकांना या योजने पासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता सर्व सामान्य नागरीकांसाठी घर मिळण्याची अशा पल्लवीत झाली आहे. कारण शासनाने आता या योजनेत बदल केलेला आहे, ज्या नागरीकांच्या नावाने घर नाही किंवा जागा नाही आणि ते अतिक्रमण करुन राहीले आहेत अशा सर्व नागरीकांना आता एएचपी योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळणार आहे. शहरात विविध ठिकाणी किंवा विविध भागात अतिक्रमण करुन राहीलेल्या नागरीकांना याचा लाभ मिळणार आहे. तर शहरातील दुर्गा नगर या भागातील कबालाधारक नागरीकांना बीएलसी योजने अंतर्गत घरकुल मिळणार आहे. तर उर्वरीत दुर्गानगर, बुध्द नगर, जावाई नगर आदी भागातील अतिक्रमणधारकांना सीएएचपी योजने अंतर्गत घरकुल मिळणार आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण धारकांनी एएचपी योजने अंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी पालिकेत अर्ज करावे असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले आहे.