धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळ्यांसाठी आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली असून,उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
जिल्ह्यातून श्री गजानन महाराज (शेगाव),श्रीसंत एकनाथ महाराज (पैठण), श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान (कोंडण्यापूर,विदर्भ) व श्री क्षेत्र मुक्ताईनगर या चार प्रमुख पालख्या (दिंडी) मार्गस्थ होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण 16 ठिकाणी पालख्या मुक्कामी थांबणार आहेत. जिथे लाखो वारकरी सहभागी होणार आहेत.
पालखी मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे आणि शासकीय आरोग्य संस्थांमार्फत स्थिर व फिरती आरोग्य पथके नेमण्यात आली आहेत.या पथकांद्वारे वारकऱ्यांना तातडीने प्रथमोपचार आणि आवश्यक औषधे दिली जाणार आहेत. जलजन्य आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकर,हॉटेल्स, ढाबे आणि इतर जलस्रोतांची तपासणी व शुद्धीकरण ग्रामपंचायती व आरोग्य कर्मचारी करीत आहेत. तसेच,किटकजन्य आजार नियंत्रणासाठी ताप सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठीही विशेष काळजी घेतली जात असून,वारकऱ्यांना “आयुष्मान भारत“ योजनेअंतर्गत हेल्थ कार्ड तयार करून देण्याची मोहिमही राबवली जात आहे.योगाचे प्रात्यक्षिक,वयोवृद्ध व असंसर्गिक आजार असलेल्या रुग्णांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचाराची माहिती देणारी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.हिरकणी कक्षाची स्थापना आणि महिला- बालकल्याण केंद्राची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात 24 तास तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी उपस्थित राहतील. तातडीच्या सेवेकरिता 102 क्रमांकाच्या 20 व 108 क्रमांकाच्या 7 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
खाजगी रुग्णालयांमध्येही 10 टक्के खाटा वारकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून,इंडियन मेडिकल असोसिएशन व इंडियन प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ संघटनांना स्वयंसेवक म्हणून सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आरोग्य सेवांचे नियोजन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.