कळंब (प्रतिनिधी)- हरी नामाचा गजर करत , विठ्ठलाचे अभंग गात पंढरपूर कडे निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजाच्या पालखीचे गुरुवार दि. 23 जुन रोजी कळंब शहरात आगमन होताच मांजरा नदी तिरावर बीड, धाराशिव जिल्हा सरहदीवर प्रथम पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार व कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी सायंकाळी 4 वाजता गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करून पूजन करण्यात आले. तसेच महसुल प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय पाटील कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक मनीषा गुरमे यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक वाघमारे, गोविंद रणदिवे यांच्यासह शहरातील नागरिक व्यापारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पालखीच्या आगमनाने शहराला पंढरीचे रूप आले होते. सोमवार दि. 23 जुन रोजी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. सायंकाळी शहरातून ही मिरवणूक निघाली. दरवर्षी शेगांव येथील गजानन महाराजांची दिंडी पंढरपूरकडे दि. 2 जुन ते 31 जुलै या कालावधीत आपली परिक्रमा पूर्ण केली जाताना कळंब मध्ये मुक्काम असतो. शहरात प्रवेश करताना भाविकांनी पालखीचे मांजरा नदी येथे पुलावर स्वागत केले. त्यानंतर ही दिंडी परळी रोड, शिवाजी चौक, होळकर चौक, नगर परिषद शाळा क्र.1 च्या मैदानात ही मिरवणूक विसर्जित करण्यात आली. श्रीची आरती होऊन बापूराव करंजकर परिवाराच्या वतीने वारकऱ्याना रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
पावलांनी आता वेग घेतला आहे. सावळ्या विठू रायाची ओढ दिवसें दिवस वाढत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
ही दिंडी 2 जून रोजी शेगाव जि. बुढाणा येथून निघाली होती. आज कळंब शहरातील बाविसवा मुक्काम होता.श्रींचे पालखी सोबत 700 वारकरी मंडळीसह 10 वाहने आहेत. वारकऱ्यांकरीता ॲम्बुलन्स गाडी, डॉक्टर व सहकाऱ्यासह आहे. याव्दारे श्री च्या पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारक-यांकरीता औषधोपचार केल्या जातो. वारकऱ्यांकरीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे. श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. 6 जुलै ला पोहचेल. श्रींची पालखीच्या ठिकाणी रात्री कीतनांचा कार्यक्रम झाला. तरी भाविकांनी कीर्तन श्रवणाचा व श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. श्रींचे पायी पालखी सोहळ्याचे हे 56 वे वर्ष आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी मुकामी श्री संस्थानच्या वतीने दशमी, एकादशी व व्दादशी (बारस) ला जवळपास 3 लाखाचे वर वारकरी भक्तांना महाप्रसाद मिष्टानासह वितरीत करण्यात येतो. संस्थेच्या नियमाप्रमाणे भजनी साहित्य जसे 10 टाळजोड, विणा, मृदंग, हातोडी व संत साहित्य श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत व श्री तुकाराम महाराज गाथा दिल्या जाते. आजपावेतो महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, तेलगंणा या 9 राज्यातील 76 जिल्हयांमध्ये आज रोजी गावांना भजनी साहित्य वितरण करण्यात आले आहे व अखंड ही सेवा सुरू आहे.
श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारी करीता जात असतांना मार्गाने भेटणाऱ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांना श्री संस्थेव्दारा प्रसादाचे वितरण करण्यात येते. तसेच दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो. ही पालखी सोहळा दि. 2 जून ते 31 जुलै पर्यंत चालतो. श्रींची पालखी वेगवेगळ्या 9 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगांव ते पंढरपूर ते शेगांव असा एकुण प्रवास 59 दिवसाचा असुन ही दिंडी 750 कि.मी. चे अंतर भक्ती भावाने पार करते.