धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे कृष्णेचे 40 टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आणण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येत आहे. दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून वाहून जाणारे हे पाणी 100 किलोमीटर बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. आणि त्यानंतर हे 40 टीएमसी पाणी बीड, धाराशिव, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांमध्ये वितरित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देऊ केले असल्याची माहिती 'मित्र'चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पुरस्थितींवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागांना जलसंपत्ती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत, कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीतून दरवर्षी वाहून जाणारे अंदाजे 40 टीएमसी पाणी 100 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. 2019 साली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे पुराचे पाणी समुद्रात न जाऊ देता, त्याचा उपयोग दुष्काळग्रस्त भागांच्या सिंचनासाठी करणे आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्थेच्या 'कृष्णा पुरनियंत्रण प्रकल्प ' अंतर्गत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाकडून 963 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, आणि जलवाहिनी प्रणाली सुधारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, पुराचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये वळविण्याची योजना आहे.
जागतिक बँकेचे तांत्रिक सल्लागार या प्रकल्पाचा 'प्रकल्प व्यवहार्यता अहवाल'पुढील तीन महिन्याच्या आत सादर करणार असल्याचेहे आमदार पाटील यांनी म्हटले आहेयावेळी कृष्णा खोरे महामंडळचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,सचिव वी एम कुलकर्णी,मुख्य अभियंता गुणाले,मुख्य अभियंता धुमाळ,उपसचिव सविता बोधेकर,अधीक्षक अभियंता शिल्पा जाधव (पाणी तंटा लवाद पुणे) अधीक्षक अभियंता कोल्हापूर अभिजीत मेत्रे,कृष्णा मराठवाडा प्रकल्प अधीक्षक अभियंता थोरात,कार्यकारी अभियंता नाईक उपस्थित होते.