धाराशिव (प्रतिनिधी) - एका तरुण वेटरच्या खून प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. त्या खटल्यात साक्षीदारांच्या उलट तपासणीत आलेल्या गंभीर विसंगती, घटनास्थळी उपस्थितीची शंका निर्माण करणारे पुरावे आणि घटनाक्रमातील तफावत तसेच ॲड अमोल वरुडकर यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद महत्त्वाचा ठरला. त्यामुळे बाल न्यायालयाच्या न्यायाधीश पटाले यांनी आरोपीची दि.5 जून रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुणवंत पेंडपाले या तरुणाचा खून करण्यात आला. या खून प्रकरणी धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथील एका तरुणावर खुनाच्या बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 85/2021, भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (खून), 201 (गुन्हा लपवणे) आणि 34 (सामूहिक उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला बाल न्यायालयाच्या न्यायाधीश पटाले यांच्या न्यायालयात चालला. आरोपीवर धाब्यामध्ये काम करणाऱ्या गुणवंत पेंडपाले या वेटरला मारहाण करून ठार मारल्याचा आरोप होता.
मात्र, या प्रकरणातील साक्षीदारांच्या उलट तपासणीत आलेल्या गंभीर विसंगती, घटनास्थळी उपस्थितीची शंका निर्माण करणारे पुरावे व घटनाक्रमातील तफावत यामुळे खटल्यातील उणिवा प्रकर्षाने समोर आल्या. या सर्व बाबींमधील बारकावे पद्धतशीरपणे न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून देत ॲड. अमोल वरुडकर यांनी अत्यंत काटेकोर, प्रभावी आणि कायदेशीर चौकटीत राहून सादर केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. ॲड वरुडकर यांनी केलेला युक्तिवाद व साक्षीदारांची विसंगती तसेच ठोस आणि निर्णायक पुरावे नाहीत. केवळ तर्कशक्तीवर आधारित आरोपीस शिक्षा देणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे न्या पटाले यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. ॲड. वरुडकर यांना ॲड. वैभव खंडेकर, ॲड. सचिन जाधव, ॲड. बालाजी पोतदार, ॲड. जनक साळुंखे, ॲड. विक्रम माने, ॲड. रजनीकांत ढेकणे, शुभंकर पानसे आणि दिपक तुपसुंदरे यांनी सहाय्यकाची भूमिका निभावली. यासाठी ॲड वरुडकर यांनी शेवटपर्यंत सत्याच्या बाजूने प्रकर्षाने बाजू मांडली. तर न्याय व्यवस्थेने दिलेल्या योग्य निर्णयामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.