धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील लोकसेवा समिती संचलित आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचा 29 वा वर्धापन दिन कालिदास जयंतीदिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने प्रशालेतील गुणवत्ताधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने झाली तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजनही यावेळी करण्यात आले.

मागील वर्षी प्रशालेच्या विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यशस्वी होऊन गुणवत्ता धारण केल्याबद्दल त्यांचा सौ सुषमाताई मिलिंद पाटील तसेच श्री विजय शहापूरकर ,शेषाद्री डांगे कमलाकर पाटील एडवोकेट मिलिंद पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आर्य चाणक्य विद्यालयाच्या मागील 29 वर्षात झालेल्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला प्रशालेतून बाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर जाऊन विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव वृद्धिंगत केले त्याबद्दल त्यांचा यावेळी शब्दसुमनांनी गौरव करण्यात आला.शाळेची गुणवत्ता आणि शाळेचा लौकिक वाढवण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रयत्न करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट मिलिंद पाटील यांनी यावेळी केले. 29 वर्षांपूर्वी  कालिदास जयंती दिनी आषाढाच्या पहिल्या दिवशी या शाळेची मुहूर्तमेढ रोवली.त्यानंतर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी ज्ञानार्जन करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला, अशा विद्यार्थ्यांपैकी प्रतिनिधिक स्वरूपात काही जणांचा त्यांच्या पालकांसह यावेळी सत्कार देखील करण्यात आला.

 
Top