भूम (प्रतिनिधी)- भूम शहरात नागरिकांची गरज नसताना राबवण्यात येत असलेल्या अमृत-2 वाढीव पाईपलाईन योजनेचा तीव्र विरोध स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी केला आहे. सदर योजनेअंतर्गत घरगुती नळांना मीटर लावून कर आकारणी करण्याचा निर्णय नगर प्रशासनाने घेतला असून, यामुळे सामान्य नागरिकांवर अवास्तव आर्थिक भुर्दंड लादला जाणार आहे. या विरोधात 25 जूनला भूम बंदची हाक देण्यात आली असून, चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

सदर योजना भूम शहरात गरज नसताना लादण्यात येत आहे. 2008 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमुळे पुढील 30 ते 40 वर्षे पाणीपुरवठा सुरळीत चालू शकतो, असे असताना नव्याने वाढीव पाईपलाईन घालणे हे अनावश्यक आणि प्रशासन-कंत्राटदार यांच्या संगनमतातील आर्थिक गैरव्यवहार झाकण्यासाठीचे पाऊल आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील नुकतेच बनवलेले सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, डांबरी रस्ते जेसीबी आणि ब्रेकरच्या सहाय्याने फोडले जात आहेत. परिणामी घरांना तडे जाणे, रस्त्यांचे नुकसान आणि नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत.

तात्कालीन प्रशासक आणि नगर अभियंता यांनी निकृष्ट दर्जाचे काम, बोगस बिले व आर्थिक अपहार केल्याच्या तक्रारी आधीच प्रशासनाकडे दाखल आहेत. तरीही चौकशी पूर्ण होण्याआधीच पुन्हा नव्या योजनेद्वारे नागरिकांना वेठीस धरले जात आहे. नवीन योजनेनुसार प्रत्येक नळाला मीटर बसवून कर आकारणी केली जाणार आहे. परंतु याबाबत नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. भूमसारख्या शहरातील सामान्य नागरिकांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती लक्षात घेता ही योजना पूर्णतः अन्यायकारक आणि परवडणारी नाही, असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर काँग्रेस तालुकाअध्यक्ष रुपेश शेंडगे, भाजप तालुकाअध्यक्ष संतोष सुपेकर, उबाठा पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शाळू महाराज, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब वीर, पॅन्थर सेना अध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, माजी नगरसेवक पिंटू माळी, अमोल सुरवसे, शँकर खामकर, सिद्धांत जाधव, विहंग कदम, दीपक पवार, फेरोज बागवान, महादेव शेंडगे, निलेश शेळके, तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

 
Top