धाराशिव (प्रतिनिधी)- अमली पदार्थांची विक्री थांबवण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या गस्तीदरम्यान मुंबईकडे विक्रीसाठी नेण्यात येणारा 1 लाख 65 हजार 400 रुपये किंमतीचा 8.27 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई 12 जून 2025 रोजी पहाटे येडशी येथील हॉटेल समाधानसमोर करण्यात आली.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिलेल्या आदेशानंतर सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गस्तीदरम्यान एका काळ्या बॅगेसह संशयित इसमाला अडवले. विचारणा केली असता त्याने बॅगेत गांजा असल्याची कबुली दिली. तातडीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पंचनामा करून सदर गांजा जप्त करण्यात आला.
वसंत भालचंद्र शिंदे (रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो ढोकी येथून ट्रॅव्हल्सद्वारे मुंबईला गांजा विक्रीसाठी नेत असल्याची कबुली तपासात समोर आली आहे. त्याच्यावर पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक 125/25, कलम 8 (क), 20 (ब)(2)(ब) एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानीय गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलिस निरीक्षक मारुती शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलिस उपनिरीक्षक उद्धव हाके, हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, तसेच डॉग स्कॉडचे सुजित वडणे व संतोष शाहीर, वाघमारे, भांतलवंडे, चालक रत्नदीप डोंगरे, रामलिंग बनाळे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वीपणे पार पडली.