धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियोजनातून काम करण्यात येईल.जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी आणि जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून लागलेला शिक्का पुसण्यासाठी तसेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची, उपक्रमांची,प्रकल्पांची व अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
दि. 1 मे रोजी 66 व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देवून मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक नागनाथ कुंभार,भास्कर नायगावकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, अपर पोलीस अधीक्षक अफशत आमना, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सरनाईक बोलतांना म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2024 -25 या वर्षात 495 कोटी 96 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आला.राज्य शासनाच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून जिल्ह्यातील 4 लक्ष 7 हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हयात 14 हजार 533 महिला स्वयंसहायता समुह तर 782 ग्रामसंघ व 55 प्रभाग संघ स्थापन करून या प्रभागसंघांना 4 कोटी 80 लक्ष रुपये निधी जिल्हा नियोजन समितीकडून दिला आहे. बचतगटांच्या उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी तुळजापूर येथे उमेद मॉल उभारण्यात येणार असून जिल्हयातील 14 हजार स्वयंसहाय्यता समुहांना 532 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करुन दिले. त्यामुळे बचतगटाच्या महिला विविध छोटया उद्योग व्यवसायातून स्वावलंबी व सक्षम होतांना दिसत असल्याचेही पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस बॅन्ड पथक राष्ट्रगीत आणि राज्यगीत घून वाजवून मानवंदना दिली. या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, प्रतिष्ठित नागरिक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक हणमंत पडवळ यांनी मानले.