तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. 25 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मराठा वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
25 मे रोजी होणाऱ्या या मेळाव्याच्या नियोजनासाठी सोमवार दि. 12 मे रोजी दुपारी 4 वाजता संयोजन समितीची श्रीनाथ मंगल कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत भोजन व्यवस्था,बॅनर लावणे, कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, समित्याची निवड, कार्यक्रमाचे नियोजन,नोंदणी टेबल,प्रमुख पाहुणे, बैठक व्यवस्था आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच यापुढील संयोजन समितीची बैठक बुधवार दि. 21 में रोजी दुपारी 4 वाजता घेतली जाणार असून त्या बैठकीत अंतीम आढावा घेतला जाणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत मेळाव्याच्या माध्यमातून वधु-वराची पसंती झाली तर संयोजन समितीच्या वतीने मणी मंगळसूत्र घालून लग्न लावून देण्याची कल्पना संयोजन समिती सदस्य उत्तम नाना अमृतराव तुळजापूर यांनी मांडली त्यास सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली.
या मेळाव्यासाठी सर्वतोपरी तयारी केली जात आहे. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या मेळाव्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरुन मराठा समाजातील वधू- वर व पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावा, या मेळाव्याच्या माध्यमातून उपवर-वधूंना योग्य जोडीदार मिळून उपवर-वधूंची सोयरीक जुळावी तसेच गरीब पालकांच्या मुलींचे विवाह आदर्श पद्धतीने व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या सर्व नियोजनासाठी संयोजन समितीची सोमवारी श्रीनाथ मंगल कार्यालयात यशस्वी बैठक पार पडली.
यावेळी उत्तम अमृतराव, अशोक गायकवाड, प्रा. अभिमान हंगरगेकर,गणेश पुजारी,नागनाथ भांजी, उमाजी गायकवाड, विश्वास मोठे, सुहास साळुंके, अशोक ठोंबळ, राहुल जाधव,नागनाथ वाघ, अशोक चव्हाण, गोरोबा लोंढे, संजय शिंदे, अण्णा कदम, दत्तात्रय घाडगे, राजु तांबे, अमोल निंबाळकर, प्रकाश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.