धाराशिव (प्रतिनिधी)- आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे उदघाटन १ मे महाराष्ट्र स्थापना दिनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,अरुणा गायकवाड,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
गरजू रुग्णाला वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता रूग्ण आणि रुग्णाचे त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात.दिलेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते वारंवार मंत्रालयात येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
कक्षाकडे असलेली जबाबदारी
अर्ज करण्यासाठी रूग्ण व नातेवाईकांना मदत करणे.प्राप्त अर्जांची सद्यस्थिती उपलब्ध करुन देणे.रूग्ण व नातेवाईकांच्या समस्यांचे निराकरण करणे.आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे.नागरिकांमध्ये कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिध्दी करणे.कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे.जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अधिकाधिक देणग्यांचा ओघ येण्याकरिता प्रयत्न करणे.अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे.
रूग्ण व नातेवाईकांना होणार कक्षाचे फायदे
रूग्ण व नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला अर्ज करण्याकरिता मदत मिळणार आहे.अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी,माहिती सहज उपलब्ध होणार आहे.संलग्न असणाऱ्या रूग्णालयांची यादी मिळणार आहे.अर्ज किंवा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही.अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजणार आहे.