धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने वादळी वाऱ्यांसह कहर केला आहे. पपई, कलिंगड, खरबूज, रब्बी कांदा, आंबा, डाळींब अशा बहुमूल्य फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विजेचा फटका बसून काही शेतकऱ्यांची जनावरे दगावली असल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. मान्सून पूर्व पावसाचा तडाख्यामुळे शेती,जनावरे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे तात्काळ पंचनामे करा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

अनेक घरांवरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, त्यांच्या निवाऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देणे बाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्राद्वारे सूचना केल्या असून संबंधित यंत्रणांना देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदतीचा हात दिला जावा, अशी मागणीही होत आहे. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदतकार्य सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे. ही मागणी आता जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनास पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.


 
Top