धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, तुळजापूर आणि औसा तालुक्यातील गावांसाठी महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाची दुसरी निविदाही जाहीर करण्यात आली आहे. सातत्याने आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तीन तालुक्यातील 23 गावातील साधारणपणे 9 हजार हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार आहे.अशक्यप्राय वाटणाऱ्या या दुरुस्तीच्या कामासाठी तत्कालीन उप-मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीची अभूतपूर्व तरतूद केली. असल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या योजनेतील स्थापत्य विभागानंतर आता विद्युत विभागातील कामाचीही निविदा आता जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कामही लवकरच सुरु आहे. हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी आपल्या आग्रही मागणीनुसार टोकन प्रोव्हिजन अर्थात लेखाशीर्षकात निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे पहिल्यांदा स्थापत्य विभागातील 32 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेचा टप्पा गाठता आला. स्थापत्य विभागाच्या कामापाठोपाठ आता विद्युत विभागातील 14 कोटी रुपयांच्या कामाचीही निविदा जाहीर करण्यात आली आहे.
तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील 23 गावांतील साधारणपणे 9 हजार हेक्टर क्षेत्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती खर्चास आपल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वीच 113 कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. पाच टप्प्याची असणारी ही योजना मागील अनेक वर्षे बंद असल्याने स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती. या तिन्ही विभागांचा समन्वय साधून या तिन्ही विभागांकडून एकत्रित अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक त्रुटींची पूर्तता करून या तिन्ही विभागाच्या समन्वयाने निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामासाठी 113 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीच्या कामास तांत्रिक मान्यता मिळवून घेतली.
उपसा सिंचनसाठी 42 दलघमी पाणी राखीव
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे तेंव्हाच आपल्या हक्काचे 42 दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आलेले आहे. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेत पाच टप्प्यात स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी आशा तिन्ही विभागाचे काम समाविष्ट आहे. स्थापत्य विभागासाठी 40 कोटी, यांत्रिकी विभागासाठी 43 कोटी 17 लाख आणि विद्युत विभागातील दुरुस्तीसाठी 30 कोटी 34 लाख अशा एकूण 113 कोटी 53 लाख रुपयांची अभूतपूर्व तरतूद केल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे आभारही मानले आहेत.