परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा आधुनिक शेती व वाढत्या यांत्रिकीकारणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधावरील अरूंद शेतरस्ते बारा फूटांचे करण्याचा अतिशय क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय 60 वर्षानंतर महायुती सरकारने घेतल्याबद्दल भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आनंद व्यक्त करून विशेष म्हणजे या रस्यांची नोंद 7/12 उताऱ्यावर होणार आहे.
बांधावरून जाणारे सध्याचे पारंपारिक अरुंद शेतरस्ते आधुनिक कृषी अवजारांची ये-जा सुलभ व्हावी, तसेच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहचावा यासाठी 3 ते 4 मीटर, म्हणजे जवळपास 12 फूट करण्यात येणार आहेत. पारंपरिक शेत रस्ता बांधणीच्या 1966 च्या निर्णयानंतर प्रथमच म्हणजे, सुमारे 60 वर्षांनी महाराष्ट्राच्या आधुनिक शेतीसाठी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी हिताची पायाभरणी होत असून, सर्वंकष सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय धडाकेबाज व कार्यक्षम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, शेतरस्त्यांच्या जागांमध्ये अतिक्रमणासह भविष्यातील खरेदी विक्रीच्यावेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नयेत म्हणून या शेतरस्त्याची नोंद जमिनीच्या 7/12 मध्ये होणार आहे. हे शेतरस्ते जलदगतीने पूर्ण करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याबाबत शासन आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक शेती व उत्पन्नवाढीसाठी या निर्णयाचा निश्चितच शेतकऱ्यांना लाभ होईल, असे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.