तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्य शासनाने अकरावी वर्गाचे प्रवेश ऑनलाईन करण्याची प्रक्रिया या वर्षीपासून सुरू केली आहे. या प्रक्रियेच्या नोंदणीसाठी राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये प्रत्येक विद्यार्थी 100 रुपये जमा करणार आहे. या विद्यार्थ्याच्या प्रत्येकी 100 रुपयांच्या रक्कमेमुळे राज्य शासनाकडे 20 कोटी 43 लाख 25 हजार 400 रुपये जमा होत आहेत.
एका बाजूला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. उच्च शिक्षणामध्ये मुलींना मोफत शिक्षण देणे देखील सुरू झाली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी देखील शासन अनेक सुविधा देते आहे. तरीही 11 वी प्रवेशाच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी शंभर रुपये घेण्याचा अट्टाहास का केला जातो आहे. असा प्रश्न समाजातून विचारला जातो आहे. ही शंभर रुपये रजिस्ट्रेशन फीस राज्य शासनाने माफ करावी. रजिस्ट्रेशन मोफत करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
ऑनलाइन प्रवेश पद्धती सुरू करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाईट पूर्ण क्षमतेने चालत नसून दोन वेळा यासाठी अपडेट करण्याचे कामकाज झालेले आहे. तरीही राज्य शासनाने दिलेली 26 जून ही रजिस्ट्रेशनची दिनांक प्रत्येक शिक्षकाला त्रासदायक ठरलेली आहे. तासून तास वेबसाईटवर बसल्यानंतर देखील नोंदणीचे काम पूर्ण होत नाही यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच पालकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही वेबसाईट अद्यावत आणि पूर्ण क्षमतेने कामकाज करत नसल्यामुळे यावर्षी ऑनलाईन प्रवेशाची ही प्रक्रिया पूर्ण होईल की नाही याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य पातळीवर महाराष्ट्रामध्ये एकूण 9281 महाविद्यालय असून 2 लाख 43 हजार 254 एकूण अकरावी वर्गाच्या प्रवेश क्षमतेची संख्या आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे प्रवेश संख्या आठ लाख 52 हजार 206, वाणिज्य शाखेची प्रवेश संख्या पाच लाख 40 हजार 222, कला शाखा प्रवेश संख्या सहा लाख 50 हजार 682 एवढी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी प्रत्येकी शंभर रुपये द्यावे लागत आहेत.
महाविद्यालयाची प्रवेश मी वेगळी आणि ही रजिस्ट्रेशन फीस वेगळी अशी वेगवेगळी फीस विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. ही वेबसाईट त्रासदायक असल्यामुळे लवकरात लवकर पूर्ण क्षमतेची वेबसाईट करण्यात यावी अन्यथा जुन्या पद्धतीने प्रवेश करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
राज्य शासनाने अकरावी प्रवेश ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सक्षम आणि पूर्ण क्षमतेची केली पाहिजे. ज्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना महाविद्यालयांना त्रास होणार नाही.
प्रा. रमेश नन्नवरे
धाराशिव जिल्हाध्यक्ष ज्यू. कट्टा