धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अनेक वीजग्राहक छतावरील सौरऊर्जाकडे वळू लागले असून, ते स्वतःच स्वतःची वीज तयार करत आहेत. प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी फलदायी ठरू लागली असून वीजबील शून्यावर आले आहे. सूर्यघर योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1052 घरगुती वर्गवारीतील ग्राहक विजेबाबत स्वयंपूर्ण झाले आहेत.
महावितरणकडून धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 52 वीजग्राहकांनी घराच्या छतावर सौरऊर्जेचे संच बसवले आहे. यामध्ये धाराशिव विभागातील 840 तर तूळजापूर विभागातील 212 वीजग्राहकांचा समावेश आहे. 1 हजार 163 वीजग्राहकांच्या छतावर सौरऊर्जा संच बसविण्याचे काम सुरू असून, लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. या वीजग्राहकांच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 3.83 मेगावॅट इतकी आहे.
योजनेसाठी अनुदान
केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी 78 हजार रुपये थेट अनुदान मिळते. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचाही निर्णय महावितरणने घेतला आहे. छतावरच्या सौरऊर्जा प्रकल्पात घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य होते.