धाराशिव (प्रतिनिधी)- संविधानाला न मानणारी मंडळी ते बदलण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतू सर्व वंचित समुहाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्त्वांचा समावेश करून सर्वांचे हक्क व सुरक्षितता भरभक्कम करुन ठेवलेली आहे. त्यातच जनतेचा संविधानावर प्रचंड विश्वास असल्यामुळे संविधान त्या मंडळींना बदलता येत नसल्याचे ठाम प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयातील संविधान अभ्यासक प्रा. ॲड. जयमंगल धनराज यांनी दि.10 एप्रिल रोजी केले.
धाराशिव शहरातील सोनाई फंक्शन हॉलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने दोन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते भारतीय संविधानाची 75 वर्षे : वाटचाल, सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मनोहर सिरसाट हे उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड धनराज म्हणाले की, डॉ आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या संविधानामध्ये नागरिकांचे मुलभूत अधिकार, हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या यांचे कवचकुंडले घटनेच्या भाग 3 व 4 मध्ये समाविष्ट केली असल्याची त्यांनी सांगितले.
तर प्रा. डॉ. सिरसाट म्हणाले की, डॉ आंबेडकरांनी ज्यांचे ज्यांचे शोषण झाले. त्यांचे त्यांचे पोषण करण्याची जबाबदारी संविधानाच्या माध्यमातून घेतली असून हे राष्ट्र निर्माणाचे काम आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिनकर झेंडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय मारोती पवार यांनी केले. तसेच सूत्रसंचालन बाबासाहेब मनोहर यांनी केले. उपस्थिततांचे आभार त्रिशला ठाणांबीरे यांनी मानले. यावेळी महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.