उमरगा (प्रतिनिधी)- मागील सहा महिन्या पासून ग्राम रोजगार सहाय्यकांना मानधन मिळत नसल्याने कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन पुकारले आहे. संघटनेच्या वतीने मंगळवारी दि. 1 एप्रिल रोजी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
तहसीलदार गोविंद येरमे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तालुक्यातील ग्रामपंचायतीत काम करीत असलेले ग्रामरोजगार कर्मचारी यांचे मागील सहा महिन्यापासून मानधन दिले नाही. शासनाने दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी रोजगार सेवकांचा फिक्स मानधन बाबतचा जीआर काढलेला आहे. परंतु त्या नुसार शासनाने रोजगार सेवकांच्या वैयक्तिक खात्यावर अजून पर्यंत मानधन जमा केलेले नाही. ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हजारो मजुरांच्या हाताला काम देणारा रोजगार सेवक स्वतःच्या संसाराचा गाडा चालविण्यात असमर्थ ठरत आहे. मनरेगा सारखी योजना ग्रामरोजगार सेवकांनी प्रभावी अंमलबजावणी करुन प्रगतीपथावर आणली. मनरेगातून राज्याला प्रगतीपथावर आणणारा मनरेगाचा मुख्य कना ग्रामरोजगार सेवकांची सहनशीलता पूर्णपणे संपलेली आहे. रोजगार सेवक हा तुटपुंजा मानधनावर काम करीत आहे. सहा महिन्यांपासून मानधन नसल्याने त्याच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे.रोजगार सेवकांचा विचार करुन लवकर मानधन जमा करण्यात यावे. या मागणीसाठी दि. 1 एप्रिल पासून कामबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष नागेश टोंगळे, उपाध्यक्ष बी.आर.घोडके, सचिव संभाजी नागसेन, सिद्धेश्वर कांबळे, गुलाब फडताळे, राहुल राठोड, गंगाराम गुंजले, प्रवीण सगर, सत्यवान गायकवाड, अंबादास जाधव, प्रताप लांमजने, गोपीनाथ कांबळे,श्रीकृष्ण गायकवाड, नितीन कारभारी,विष्णू पांचाळ आदींच्या सह्या आहेत.