भूम (प्रतिनिधी)- शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागातही साहित्यीक निर्माण झाले पाहिजेत . याच उद्देशाने अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्थेच्यावतीने शाखेचा शुभारंभ आणि भूम येथील जिल्हा परिषद शाळेत प्रथमच नववर्ष गुढी पाडव्याचे निमित्ताने बालकुमार मराठी साहित्य संमेलन प्रारंभिक स्वरूपात तालुका स्तरावर आयोजित केले आहे . या संमेलनात अधिकाधिक बालकुमार साहित्यिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे तालुका कार्यवाहक नवकवी शंकर खामकर यांनी केले आहे .
गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी भूम येथिल जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रथमच अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्थेच्या पुढाकाराने ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री प्रा. अलका सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व जनसेवा ग्रामीण विकास संस्था उळूप तालुका भूम या संस्थेच्या सहकार्याने मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या निमित्ताने तालुकास्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे . या संमेलनात सहभागी होणाऱ्या बालकवींना सन्मानपत्र तसेच प्राधान्य क्रमाने प्रथम तिघांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे .
यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल भूमचे आदर्श मुख्याध्यापक तात्या कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा स्तरावर या संस्थेचे जाळे निर्माण करण्याच नेतृत्व करणाऱ्या साहित्यिक प्रा.अलका सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या तालुकास्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनासाठी अहिल्यानगर, जामखेड, कळंब, वाशी,परंडा येथील ज्येष्ठ बाल साहित्यिक, बाल साहित्य लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक यांचं बालकुमार साहित्यिकांना मार्गदर्शन होणार आहे . त्यांची उपस्थिती राहणार आहे .
या तालुकास्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन म्हणून धर्मदत अरुण अण्णा शाळू महाराज, ज्येष्ठ साहित्यिक आश्रुबा कोठावळे कळंब , ॲड विलास पवार तसेच प्रमुख उपस्थित म्हणून कवित्री सौ संध्याराणी कोल्हे कळंब, सौ गायत्री दिनेश तिवारी परंडा, एम आय मुजावर जेष्ठ साहित्यिक वाशी व सौ आशा राऊत कवयित्री कळंब यांची उपस्थिती राहणार आहे .
या बालकुमार मराठी साहित्य संमेलनासाठी जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अलका सपकाळ, नवकवी शंकर खामकर यांच्या बरोबरच आलिम शेख सर, प्रा. डॉ. राजश्री तावरे, दस्तगीर पठाण, अंबादास देशपांडे, सर्जेराव इंधनकर, हभप अरुण काळे महाराज, श्रीमती अंजली सुतार, हरिदास पंडित, माजी सैनिक हेमंत देशमुख व दत्तात्रय काळे हे प्रयत्नशील आहे.
आजपर्यंत भूम शहर व ग्रामीण भागात मराठी बालकुमारांसाठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले नाही. खऱ्या अर्थाने शहरीकरणा बरोबरच ग्रामीण भागात सुद्धा साहित्यक, बालकूमार साहित्यीक मोठ्या प्रमाणात दडलेले आहेत. अशा साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, मराठी भाषेला जो दर्जा मिळालेला आहे. त्या संदर्भात मार्गदर्शन होण्यासाठी, नवकवींना साहित्य लिखाणासाठी व साहित्य चळवळीला बळकटी मिळवून देण्यासाठी ग्रामीण भागात आयोजित केलेले बालकुमार मराठी साहित्य संमेलन हे निश्चितपणे प्रेरणादायी आणि वरदान ठरणार आहे असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक व्यक्त करत आहेत.
विशेष करून वाचन संस्कृती रुजावी,जिल्ह्यातून बालकुमार लेखक, वाचक वर्ग निर्माण व्हावा. दर्जेदार लेखनास बळकटी यावी. मोबाईलच्या आहारी जाणारी मुलं यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे. दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे कथाकथन, कवी संमेलन, हस्ताक्षर स्पर्धा, घेऊन मुलांचा बौद्धिक, मानसिक, भावनिक , सामाजिक विकास करणे. बालकुमार साहित्य प्रकाशित करणे व लेखनास प्रेरणा देणे. त्यांच्या कलागुणांना वाव देणे. मुलांचे भाव विश्व समृद्ध करणे. इत्यादी उद्दिष्टासह मराठी बालकुमार शाखेचा शुभारंभ होत आहे.
बालकुमार मराठी साहित्य संमेलन आणि शाखेचा उद्घाटन सोहळा अखिल भारतीय मराठी बालकुमार शाखा भूम व जनसेवा ग्रामीण विकास संस्था उळूप यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे. तरी तालुक्यातील साहित्यप्रेमी, वाचक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाखेच्या समन्वयक प्रा.अलका सपकाळ व नवकवी शंकर खामकर यांनी केले आहे.