धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूला मुंबईमध्ये चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळावी यासाठी बचत गट ते बचत भवन पर्यंत साखळी असावी. यासाठी मुंबईत बचत भवन उभारण्याच्या प्रस्ताव राज्य सरकारला देणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे उपस्थित होते. पुढे बोलताना निलम गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी बोलताना पोलिस पाटील यांची 40 टक्के पदे रिक्त असून, पदे भरण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सांगितले. आशा वर्कर्स आणि पोलिस पाटील यांच्यामुळे ग्रामीण भागात होणारे बालविवाह थांबवले जातात. एप्रिल व मे मध्ये बालविवाह न होण्यासाठी पोलिस पाटील यांनी जागृत राहण्याची गरज आहे. यावेळी गोऱ्हे यांनी अंमली पदार्थाचा विळखा, मुलींचे अपहरण, पाणी टंचाई, रोजगार हमी योजनेवरील मजुरांबाबत माहिती दिली. तुळजाभवानी मंदिरातील दागिण्यांसदर्भात आपण चौकशी केली असून, लवकरात लवकर या प्रकरणी तपास होणे आवश्यक असल्याचे सांगून आपण स्वतः या प्रकरणी सहकार्य करू असे स्पष्ट आश्वासन निलम गोऱ्हे यांनी दिले असल्याचे सांगितले.
वक्फ बोर्डाबाबत कायदा बदलणे आवश्यक
निलम गोऱ्हे यांनी लोकसभेत वक्फ बोर्डातील सुधारणेबाबत बील पास झाले आहे. वक्फ बोर्डात काही सुधारणा आवश्यक असून, काही अभ्यासू लोक या बोर्डावर असणे आवश्यक आहे. शाहाबानू प्रकरणी 1984 साली वक्फ बोर्डा ने पोटगी नाकारली होती. त्यामुळे वक्फ बोर्डात काही बदल होणे आवश्यक आहे. यावेळी पत्रकारांनी सभागृहात भाजपाच्या एका महिला लोकप्रतिनिधींनी अयोग्य भाषा वापरली याबाबत आपले मत काय? या संदर्भात विचारले असता निलम गोऱ्हे यांनी सभागृहात लोकप्रतिनिधीचे वर्तन योग्य राहणे अपेक्षित आहे. बिगर संसदीय शब्द कोणी बोलले असतील तर ते पटलावर घेत नाहीत. त्यामुळे याबाबत जास्त बोलण्याची गरज नाही असेही सांगितले.