धाराशिव (प्रतिनिधी)-  भूकंपाने बाधित झालेल्या उमरगा व लोहारा तालुक्यातील पुनर्वसन करण्यात आलेल्या 38 गावात व परिसरात मोठ्या प्रमाणात वनीकरणाचे कामे हाती घ्यावीत. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांना उन्हाळ्याच्या दिवसात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे.असे निर्देश विधानपरिषद उपसभापती प्रा.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागात सामाजिक वनीकरण करणे,जिल्ह्यात टंचाईच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे,जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि अमली पदार्थ विरोधी कार्यक्रम व ऊसतोड महिला कामगार योजनांचा आढावा घेताना डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव,प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की,ज्या 38 भूकंप बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्या गावांमध्ये स्वच्छतागृहे असल्याची खात्री करावी. या गावांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने स्मृती वने तयार करावी. ज्या 90 हेक्टरवर वनीकरणाची कामे पूर्ण झाली, उर्वरित जमीनीवर देखील वनीकरणाची कामे हाती घ्यावीत. ज्या गावांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे त्या गावांमध्ये सुविधा निर्माण झालेल्या आहेत का ते बघावे. या गावांमध्ये स्मृतिवन तयार करण्याचे नियोजन करावे. यामध्ये ग्रामस्थांना वनीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे असे त्या यावेळी म्हणाल्या. 


पाणी, चाराबाबत आढावा

यावेळी निलम गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, अंमल पदार्था विरूध्द जनजागृती, रोजगार हमी योजनेच्या कामावर महिलांसोबत आलेल्यसा लहान मुलांसाठी शेड मारणे, हरवलेल्या मुलींचा शोध घेणे आदीबाबत आढावा घेतला. यावेळी पोलिस अधिक्षक जाधव यांनी अमली पदार्थ विरोधी कार्यक्रमातून लोकांना त्याचे दुष्परिणाम आणि गुन्हेगार म्हणून त्यामध्ये सापडले तर कोणती शिक्षा होते, याची जाणीव करून देण्यात येईल तसेच हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी एक सेल तयार करण्यात आला असून त्या मागची कारणे शोधून हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यात येत आहे असे सांगितले. 

 
Top