धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाकडून पिक वीमा हप्त्याचे 2 हजार 359 कोटी रुपये इतकी रक्कम केंद्र शासनाच्या भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) कडे जमा केली आहे. केंद्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या पीक विमा कंपनीकडून (AIC) ही रक्कम आजपासून दोन दिवसात संबंधित जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना वितरित केली जाईल. आणि त्यानंतर लागलीच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख 30 हजार शेतकरी बांधवांना खरीप 2024 च्या नुकसानीपोटी 250 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे. त्यासाठी आपला राज्यसरकारकडे सतत पाठपुरावा सुरू होता अशी माहिती 'मित्र'चे उपाध्यक्षआमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी रु. 250 कोटी पेक्षा जास्तीची रक्कम आता 5 लाखाहून अधिक शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्यसरकारने ही रक्कम  कडे जमा करावी यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील 719167 शेतकऱ्यांनी 579816.21 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 549791 शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पुर्वसुचना दिल्या होत्या, त्यापैकी 532826 पुर्वसुचना पात्र झालेल्या आहेत. 532826 पात्र पुर्व सुचनापैकी 470072 पुर्वसुचना या सोयाबीन पिकाच्या आहेत. या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजित रु. 6000 ते रु.6500 विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे. काढणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पात्र 60782 तक्रारीनुसार शेतकऱ्यांना रु. 7000 ते रु. 11000 पर्यंत नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे.

राज्य सरकारने खरीप 2022 पासूनच्या राज्य शासनाचा व शेतकऱ्याच्या हिस्स्याच्या थकीत रकमेचे 2 हजार 359 कोटी रुपयांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे लवकरच ही रक्कम संबंधित विमा कंपनीस प्राप्त होईल व विमा कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात होईल असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top