धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात "गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षात २६९ जलसाठ्यांमधून तब्बल १ कोटी १० लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गाळ काढण्याचे काम अशासकीय संस्थांनी केले असून, सुमारे १० हजार शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ वाहून नेऊन ११ हजार हेक्टर क्षेत्रावर पसरवला आहे.
या उपक्रमामुळे मुरमाड व खडकाळ जमीन सुपीक झाली असून ८८०० घनमीटर पाणीसाठा पुनर्संचित करण्यात यश आले आहे.शासन अशासकीय संस्था व ग्रामपंचायतींना मशीन व इंधन भाडे देणार आहे, तसेच अल्पभूधारक तसेच विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी अनुदान मिळणार आहे. योजनेंतर्गत वाढलेली जलसाठ्यांची क्षमता व जमीन सुपीकतेत झालेली सुधारणा जिल्ह्यातील कृषी उत्पादनात मोठी वाढ घडवून आणण्यास मदत करणार आहे.