धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धाराशिव जिल्हयातील बेरोजगारीच्या मुद्यावर बोलत असताना धाराशिवच्या एम.आय.डी.सी तील जागा प्राधान्याने बेरोजगारांना उद्योगधंदे उभा करण्याकरीता प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.

भारतातील आकांक्षीत जिल्हयांच्या यादीत समाविष्ठ असणारा धाराशिव हा एक जिल्हा असून येथे मोठया प्रमाणात बेरोजगारी आहे. या जिल्हयात शाश्वत जलसिंचनाची व्यवस्था नसल्याने व मराठवाडयाच्या दक्षीण भागात या जिल्हयाचे स्थान असल्याने हा दुष्काळ प्रवण जिल्हा आहे. येथे महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकास महामंडळ यांच्याकडून कौडगाव जिल्हा धाराशिव येथे उद्योगधंदे उभा करण्याकरीता 310 हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. वडगाव (सि) येथील 89 हेक्टर जमीन संपादीत केलेली आहे. तसेच शिराढोण ता. कळंब व तामलवाडी  ता. तुळजापुर येथे नव्याने एम.आय.डी.सी. प्रस्तावीत असून येथील एम.आय.डी.सी. मध्ये ज्या उद्योग धंद्यांना पाण्याची गरज भासणार नाही असे उद्योगधंदे उभा करण्याकरीता तरुण व बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी केली आहे.


जिल्ह्यात या उद्योगाला संधी

वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योग हा महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून प्रसिध्द आहे. येथील फटाका उद्योगात मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. तसेच भुम तालुक्यातील दुध प्रक्रीया उद्योग खवा यास जी.आय. मानांकन प्राप्त असून या उद्योगातून भुम, परांडा, वाशी तालुक्यातील अर्थकरणास चालना मिळणार असून स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होवू शकतो. तसेच धाराशिव जिल्हयातील उस्मानाबादी बोकडाचे मांस देशभर प्रसिध्द असून यास जी.आय मानांकन प्राप्त आहे. यामुळेच जिल्हाभरातील चमडा व्यापार येडशी येथून चालतो. येडशी येथील चमडा बाजारातून मोठी आर्थीक उलाढाल होत असून देशभरातील चमडा उद्योगातील व्यापारी येथून खरेदी करतात. सदर चमडा वरती प्रक्रीया उद्योग निर्माण झाल्यास येडशी परीसराची वेगळी ओळख निर्माण होण्याबरोबर बेरोजगारीवर मात करण्यास मदत होणार आहे.

 
Top