तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा परिसरात  तीन बंधारे कामे झाले असुन यातील काही बंधारे अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमतांनी जिओ टॅग लोकेशन बदलून गुत्तेदार व अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे बंधारा न करता इतर ठिकाणी थातूरमातूर काम करण्यात आल्याची चर्चा होत आहे. तरी आपसिंगा शिवारातील बांधलेल्या बंधाऱ्याची क्वालिटी कंट्रोल विभागाकडून चौकशी करुन दोषी अंति संबधितांवर कारवाई करण्याची मागणी आपसिंगा ग्रामस्थांकडून होत आहे.

आपसिंगा गावालगत असलेल्या ओढ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने तीन गेटेड बंधारे बांधण्यात आले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामाने ते पोखरून गेलेले आहेत. काही ठिकाणी बिल निघण्याचा अगोदरच दरवाजे गायब झाल्याचे दिसुन येत आहेत. दरवाजे गायब झाले तर पाणी कसे थांबणार असा सवाल शेतकरी वर्गातुन केला जात आहे. सद्यःस्थितीतच बंधाऱ्याच्या भिंतीला भेगा ही पडण्यास आरंभ झाले असल्याने तरी या बांधलेल्या बंधाऱ्याची क्वालिटी कंट्रोल विभागाकडून चौकशी करण्याची मागणी आपसिंगा ग्रामस्थाकडून होत आहे.

पावसाचे वाहणारे पाणी अडवून जमिनीत जिरावे, भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, उन्हाळ्यात पाणीसाठ्याचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गेटेड बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, तालुक्यातील आपसिंगा परिसरातील या योजनेत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप शेतकरी वर्गातुन केला जात आहे. 

यातील महादेव माळ बंधाऱ्यांवर दरवाजे लावण्यात आले नाहीत. यातीलच एका बंधाऱ्याला तर काही दिवसातच भेगाही पडल्या असून, पावसाच्या पाण्याचा एक थेंबही बंधाऱ्यात जिरू शकणार नाही. शिवाय हे काम करताना कमी गेजची सळई, अत्यल्प सिमेंटचा वापर करीत मातीमिश्रित डस्टने बांधण्यात आले आहेत. काही बंधाऱ्याच्या ठिकाणी रुंदीकरण केले नसल्याचे येथील परिस्थितीवरून दिसून येत आहे.


 
Top