धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सतत कचऱ्याचा दुर्गंधीयुक्त धूर शहराच्या विविध भागांत पसरत असल्याने आबालवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ थांबवून हा कचरा डेपो इतरत्र हलवावा यासाठी 28 एप्रिलपासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

गुरुवारी दि. 17 युवा सेनेचे शहरप्रमुख रवि वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, शहरातील उचलण्यात येणारा कचरा हा शहरालगतच्या कचरा डेपो येथे टाकण्यात येतो. गेल्या काही महिन्यांपासून या कचरा डेपोमधून सतत धूर निघून तो परिसरातील लोकवस्ती असलेल्या भागात पसरत आहे. या धुरामुळे व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. धुरामुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. तसेच श्वसनाचाही अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. धुरामुळे डोळ्यांचे व श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सततच्या धुरामुळे उमर मोहल्ला, ख्वाजानगर, गणेशनगर, दर्गाह रोड, तालीम गल्ली, बस डेपो परिसर, आयुर्वेद महाविद्यालय परिसर, अहिल्यादेवी होळकर चौक, आगड गल्ली भागांतील नागरिकांना सध्या या धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचा फटका  नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या कचरा डेपोत दररोज जमा होत असलेल्या कचऱ्याचे विलगीकरण करावे. ओला व सुका कचरा वेगळा करावा. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. कचऱ्यावर योग्य प्रक्रिया व कचऱ्याचे विलगीकरण करावे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे शक्य नसेल तर हा कचरा डेपो इतरत्र हलवून परिसरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखावे, यासाठी संबंधित यंत्रणेला योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे निवेदन नागरिकांच्या वतीने यापूर्वीही देण्यात आलेले आहे. तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने यावर उपाययोजना करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 एप्रिल 2025 पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर युवा सेनेचे शहरप्रमुख रवि वाघमारे, प्रवीण कोकाटे, प्रदीप मुंडे, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, पांडू भोसले,  गणेश खोचरे,  राणा बनसोडे, राज निकम, गणेश बंडगर, बंडू आदरकर, विनोद केजकर, जगदीश माने, सुनील वाघ, दिलीप महाजन, साबेर सय्यद, शाहबाज पठाण,  नितीन राठोड, अभिराज कदम, बाळासाहेब गुंडाळे, महेश गंगणे, गजेंद्र शेरकर, महेश शेरकर, बालाजी शेरकर, कैलास शेरकर, प्रदीप साळुंके, दिलीप डोंगे, महेश शिंदे, प्रसाद तेरकर, मुजीब काझी, अमित कोकाटे, प्रदीप तेरकर, हनुमंत यादव, प्रसाद पांढरे, राहुल चव्हाण, सुनील परसे, सलीम पठाण, बाबासाहेब सावळे, अभिजित कोळी, कृष्णा आकोसकर, अविनाश इटकर, ज्ञानेश्वर ढेकणे, मनोज जाधव, रणजित दाभाडे, प्रमोद पाटील, कुणाल जानराव, पवन राऊत, निलेश साळुंके, नागेश गाडे, प्रदीप पोतदार, सुरज लोंढे, आकाश इंगळे, प्रकाश डांगे, नितीन राठोड आदींची स्वाक्षरी आहे. 

 
Top