धाराशिव (प्रतिनिधी )- बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षणाची दारे खुली व्हावीत यासाठी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली. त्यामुळेच आज बहुजन समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत होत असल्याचे दिसते. आज आपण क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, ज्योतिबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये कार्य करताना दिसतात. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून ,क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. सावता फुलसागर , सह समन्वयक डॉ.संदीप देशमुख ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री बबन सूर्यवंशी आदीसह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.