भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेत 2021 ते 2025 या प्रशासकीय कालावधीत भूम नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापनात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मस्कर व चंद्रमनी गायकवाड यांनी 3 एप्रिल रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मार्च 2021 ते मार्च 2025 या कालावधीत नगर परिषदेकडून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप असून, उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी आंदोलकांनी केली होती. 25 मार्च रोजी नगर परिषद प्रशासकांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने 3 एप्रिल रोजी नगर परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तातही आंदोलकांनी नगरपालिकेच्या गॅलरीमध्ये जाऊन अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.


आत्मदहनाची घटना सुरू होताच अग्निशामक दलाने तत्काळ हस्तक्षेप केला. मात्र, संतप्त नागरिकांनी अग्निशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक आणि तोडफोड केली. वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


या गंभीर आरोपांनंतर जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याधिकारी शैला डाके यांनी अहवाल तयार करण्यास सुरुवात केली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

भूम पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधक कारवाई केली आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

 
Top