धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात एप्रिल महिन्यात विविध धार्मिक सण,यात्रांसह सामाजिक व राजकीय आंदोलनांची शक्यता लक्षात घेता २६ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जमावबंदी व शस्त्रबंदीचा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रमुख सण व कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.१२ एप्रिल : हनुमान जयंती,१४ एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,१८ एप्रिल : गुड फ्रायडे,२० एप्रिल : इस्टर संडे,२३ ते २७ एप्रिल : श्री.संत गोरोबा काका यात्रा (मौजे तेर),२४ ते २६ एप्रिल : श्री काळभैरवनाथ यात्रा (मौजे सोनारी) याशिवाय,मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,शेतकरी मागण्या,पिकविमा भरपाई यासंबंधी विविध संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम, मोर्चे,उपोषण, रास्तारोको,बंद इत्यादी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मनाई आदेशांतर्गत खालील गोष्टींवर बंदी असेल.कोणतेही शस्त्र,काठी,तलवार, बंदूक,स्फोटके,दाहक पदार्थ जवळ बाळगणे.दगड,विटा,तोडफोडीची उपकरणे जमा करणे.वरील प्रतिबंधात्मक आदेश खालील बाबींसाठी लागू राहणार नाही. यामध्ये अंत्ययात्रा,धार्मिक विधी,लग्न सोहळा सामाजिक सण,शासकीय कार्यक्रम इत्यादी,शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक मिरवणुकीचे सिनेमागृह व रंगमंच इत्यादी. 

प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा,मिरवणुका तसेच सभा,निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचे झाल्यास पोलीस अधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.अशी परवानगी घेतल्यानंतरच प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार नाही.असे प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी या आदेशात नमूद केले आहे.


 
Top