भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरसोली ते भूम हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा ग्रामस्थ महाराष्ट्र दिनी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, भूम ते आरसोली या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही दिवसांत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता बार्शी येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग असून या रस्त्याने रहदारी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुचाकी सारखी वाहने देखील व्यवस्थित जात नाहीत. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत असून या रस्त्यावरील डांबर व खडी पावसाने वाहून गेली असल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. खराब रस्त्याचे कारण सांगून या मार्गे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे दवाखाना, शाळा, महाविद्यालय, शेतमाल यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत येथील नागरिकांनी प्रशासन,लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेकदा तक्रार केली. मात्र यावर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरकांमध्ये तीव्र संताप व असंतोष निर्माण झाला आहे.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम किती दिवसात पूर्ण होईल हे दहा दिवसात लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा येथील ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दि.1 मे 2025 रोजी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.