धाराशिव (प्रतिनिधी)- नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील गंधोरा तांडा येथील महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आंदोलन बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेतले आहे.
गंधोरा येथील रामराव नगर तांडा येथील विमल पंडित राठोड या महिलेने नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करून अटक करण्यात यावी. या मागणीसाठी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या प्रकरणात बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकानी सदरील गुन्ह्याचा तपास करून पुरावे मिळून येताच आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पत्र दिले. तर आवश्यकता पडल्यास यापुढेही आपण या प्रकरणात पाठपुरावा करणार असल्याचे शिंगाडे यांनी त्यांना आश्वसित केले. त्यानंतर विमल राठोड यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राठोड कुटुंबीय उपस्थित होते.