धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशीव तालुक्यातील कावलदरा (बावी) परिसरात धुळे -सोलापूर महामार्गावर गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चारचाकी वाहनांना अडवून वाहनांमधील प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याजवळील किंमती वस्तू लुटल्याची धक्कादायक घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गवर चारचाकी गाड्या अडवून महिलासह अन्य प्रवाशांना मारहाण करीत लुट केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथे पहाटे 4 च्या दरम्यान 4 ते 5 गाड्यांना अडवून त्यातील महिला व प्रवाशांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडील सोने, मोबाईल व इतर वस्तू लुटले होते. या वाटमारीचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असुन 5 ते 6 जणांच्या सशस्त्र टोळीने मारहाण करीत लुट केली होती. दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ वेगवान तपास करत लुटणाऱ्या टोळीतील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात आरोपींना पकडले. विशेष म्हणजे याच टोळीने रात्री नळदुर्ग भागात 6 शेळ्या आणि काही वाहनातील डिझेलची चोरी केली होती. या टोळीतील चार आरोपींना पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीसह येडशी टोल नाका येथे ताब्यात घेतले. आरोपींकडून नळदुर्ग येथून चोरलेले डिझेल आणि सहा शेळ्या देखील यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. हे आरोपी तेरखेडा परिसरातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून, यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारची लूटमार केल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, या टोळीतील इतर तीन आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पळून गेलेल्या आरोपींचा धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेळके आणि त्यांचे पथक पथक शोध घेत आहे.