धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देऊन कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक अत्यंत प्रामाणिक काम करणारे मंत्री असून,त्यांची महायुतीच्या नेत्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून बदनामी सुरू आहे. प्रताप सरनाईक पालकमंत्री झाल्यापासून त्यांना बदलण्यासाठी शडयंत्र रचले जात आहेत. हे सर्व भाजपचे प्रयत्न आहेत. त्यांच्या बद्दलच्या अफवा, चर्चा थांबवा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना देण्यात आलेल्या स्थिगितीच्या पार्श्वभूमीवर सुधीर पाटील यांनी रविवार दि. 6 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, महायुतीच्या काही नेत्यांनी पडद्यामागून पालकमंत्र्यांची बदनामी सुरू केली असून,त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले जात आहे. असे प्रकार सुरूच राहिल्यास आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोबत राहायचे की नाही, हे ठरवावे लागेल. जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मीच सर्वेसर्वा
पालकमंत्री बदलण्याचे डाव असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. महायुतीतील सर्वच तिन्ही पक्ष मीच चालवतो, मी काहीही करू शकतो, पालकमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांकडून अडवू शकतो, अशी तुळजापूरच्या लोकप्रतिनिधींची धारणा त्यांची झाली आहे. अशा अनेक घटना घडत आहेत. अशी टिका भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता सुधीर पाटील यांनी केली.
लोकप्रतिनिधींना निधी वाटप करण्याचे सूत्र वरिष्ठ स्तरावरून ठरलेले असताना अडवणूक कशासाठी का केली जात आहे. असा सवाल करून निधी अडवण्याचा कुणालाही अधिकार नाही. पालकमंत्र्यांची बदनामी सहन केली जाणार नाही, जिल्हा नियोजन समितीच्या कामात टक्केवारी वगैरे काहीही नाही.केवळ बदनामीपोटी हा प्रकार सुरू आहे. खालच्या खाली हे प्रकार सुरू आहेत. पालकमंत्री आणि त्यांच्या स्वीय सहायक यांच्याशी माझे बोलणे झाले आहे.त्यांनी असे प्रकार खपवून घेणार नाही, असे सांगितले आहे.
21 तारखेला उपोषण
जिल्हा नियोजन समितीच्या कामावरील स्थगिती 21 तारखेपूर्वी उठवावी, शासनाने याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा स्व.बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व शिवसैनिक आंदोलनात उतरतील आणि 21 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू होईल, असा इशारा सुधीर पाटील यांनी दिला.