धाराशिव (प्रतिनिधी)- जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे या विभागाशी सर्व यंत्रणा नागरी शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करावे. अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी आज दिल्या

जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल 2025 जल व्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजना संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी जलसंपदा (विदर्भ तापी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्य प्रणाली द्वारे), जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे उपस्थित होते. बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात यावा लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. या पद्धतीने जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जल व्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये कालव्याची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी. तसेच कालव्याच्या दुतर्फा मनरेगा योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याची नियोजन करण्यात यावे.

कालवे स्वच्छ आणि प्रभावी राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिभा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरी यांचाही सहभाग होऊन जल व्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच कालव्यावरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे.

जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा या जागांचे 7/12 वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका महानगरपालिका आणि क्षेत्रीय स्तरावर उपाय योजना राबविण्यात याव्यात अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे. अशा सूचनाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.


अधीक्षक अभियंता विजय थोरात यांचे नागरिकांना आव्हान

जिल्हा स्तरावरील धाराशिव जिल्ह्यामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शेतकरी पाणी वापर संस्था संवाद थकीत पाणीपट्टी वसुली जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग व त्यांच्यामध्ये पाणी वापरा बाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तालुका निहाय शाळांमधून जलजागृतीवर विषयांमधून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे. दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचे महत्व त्याचा काटकसरीने वापर कसा करावा याबाबत व्याख्यानाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असणारे कीर्तन प्रवचन ग्रामीण भागातील लोकांना पाण्याचे महत्व समजावून सांगितले जाणार आहे. गावोगावी लोककलेच्या माध्यमातून समाज जीवनाशी आपली नाळ जोडणारे वासुदेव यांचे माध्यमातून जलजागृतीपर अभंग, ओव्या यांचा प्रभाव वापर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जाणार आहे. जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 चे तालुका निहाय व उपविभाग निहाय नियोजन करण्यात आलेले आहे. त्याकरिता सर्वांनी कृतीयुक्त सहभाग नोंदवावा असे आवाहन विजय थोरात अधीक्षक अभियंता धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव यांनी केलेले आहे.

 
Top