धाराशिव (प्रतिनिधी)- वन ट्रिलियन एकोनॉमीचा गाजावाजा होतो. विकसित महाराष्ट्र, महाराष्ट्र आता थांबणार नाही असल्या घोषणा होतात पण दुसऱ्या बाजूला तीन महिन्यापासून रोजगार हमीवर असलेल्या मजुरांना मजुरी दिलेली नाही. मग असल्या घोषणाच काय करायच असा परखड सवाल आमदार कैलास पाटील यांनी सरकार केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर मंगळवार दि. 25 मार्च रोजी सभागृहात बोलत होते. 

यावेळी आमदार पाटील म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमधील एक आरोपी अजूनही फरार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला हे सिद्ध होऊनही अद्यापही त्या पोलिसांवर कारवाई झालेली नाही हे गृह विभागाचे अपयश आहे. तसेच या राज्यात शिवाजी महाराज यांचे नाव घेउनच आपण कोणतंही चांगले कार्य करतो. पण त्याच महाराजांबद्दल महाराष्ट्र राज्यातच अपशब्द वापरले जात असतील तर आपण या राज्यात राहण्याच्या लायकीचे नाहीत असा वार आमदार पाटील यांनी सरकारवर केला. कोण फालतू कोरटकर महाराजांविषयी फालतू बोलतो व आपण ऐकून घेतो. त्याला अटक होत नाही. आज त्याला अटक केली असले तरी त्याला कोणाचा आश्रय होता, तो कोणाचा पाहुणा आहे असाही सवाल आमदार पाटील यांनी विचारला. 


लक्षवेधी मांडण्यापूर्वीच उत्तर बाहेर

अमली पदार्थ विक्री अगोदर मोठया शहरात व्हायची पण आता हे लोन ग्रामीण भागापर्यंत पोहचल आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मध्ये पानपट्टीमध्ये ड्रग्ज मिळत असेल तर गृह विभाग काय करत होता. याविषयी लक्षवेधी दिली होती पण ती मांडता आली नाही. तसेच दुर्देवाने त्याच उत्तर अगोदर बाहेर आले. सात महिन्यापूर्वी परंडा येथे ड्रग्ज सापडले होते. पण ज्या दिवशी लक्षवेधीच उत्तर आले त्याच दिवशी या परंडा येथे पकडलेले ड्रग्ज नसून कॅल्शियम क्लोराईड असल्याचे पोलीसानी सांगितले. हा योगायोग म्हणायचा अजून काय याचा शोध गृह विभागाने घ्यावा. तुळजापूरमध्ये तीनवेळा ड्रग्ज पकडण्यात आले. याच कनेक्शन सोलापूर - पुणे - मुबंई असे आहे. आतापर्यंत या प्रकरणात 19 जणांना अटक केली आहे. पण मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहे. यामध्ये कोणी असू द्या मग तो राजकीय व्यक्ती असो की पोलीस, त्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.  

यावेळी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, सोयाबीन खरेदी, पीककर्ज, कैलास नागरेची आत्महत्या, लाडकी बहीण, नवीन शैक्षणिक धोरण आदीबाबत आमदार कैलास पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. 

 
Top