धाराशिव (ंप्रतिनिधी)- जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमी आहे.अनेक गावांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन शोषखड्डे तयार करण्यात यावे तसेच जल पुनर्भरणाचे कार्यक्रम देखील हाती घेण्यात यावे. यंत्रणांनी सामूहिक शेततळे,सिमेंट नाला बंधारे, मातीनाला बांध,विहीर पुनर्भरण शासकीय व खाजगी इमारतीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे भूगर्भात संचयन करताना भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी यंत्रणांनी विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
25 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात पाणी पुरवठ्याची संबंधित यंत्रणांचा आढावा घेताना श्री.पुजार बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) धरमकर,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आवटी,जिल्हा जलसंधारण अधिकारी पि.के महामुनी, जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी सी.आर. राऊळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.ढवळे,जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कनिष्ठ वैज्ञानिक श्रीमती डोंगरे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता श्री पोद्दार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुजार म्हणाले की,धाराशिव व कळंब तालुक्यातील ज्या 72 गावातील भूजल पातळी कमी आहे,त्या गावातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करून मोठ्या प्रमाणात येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यात यावे.त्यामुळे या गावातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.या गावाच्या शिवारात शेततळी,नाला खोलीकरण,तलावातील गाळाचा उपसा करणे,गॅबिरीयन बंधारे तयार करणे,शेततळे तयार करणे,सिमेंट नाला बंधारा बांधणे, रिचार्ज शाफ्टची कामे मोठ्या प्रमाणात यंत्रणांनी आत्ताच हाती घ्यावीत.भूगर्भात पाण्याचे संकलन करण्यासाठी ग्रामस्थांना सहभागी करून घ्यावे.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करावे, असे ते यावेळी म्हणाले.
ज्या गावात भूजल पातळी कमी आहे,अशा गावात आवश्यक त्या उपायोजना करण्यात याव्यात असे सांगून श्री.पुजार म्हणाले,या गावातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनावर भर देण्यास प्रोत्साहित करावे.आवश्यक त्या ठिकाणी गॅबिरीयन बंधारे,सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण व तलावातील गाळ उपसणे,जलतारा,शोषखड्ड्याची कामे एप्रिल आणि मे महिन्यात हाती घ्यावी. त्याचा उपयोग पावसाळ्यात होणार असून त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे श्री.पुजार यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला उपस्थित संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाकडून भूजल पातळीच्या वाढीसाठी व जलसंधारणासाठी करण्यात येत असलेल्या कामांची व उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.