धाराशिव (प्रतिनिधी)-राज्य सरकारने जाहीर केलेल्या बजट मध्ये धाराशिव जिल्ह्यातील विकास कामासाठी प्रत्येक 1-1 हजार रूपयांची तरतूद केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकास कामासंदर्भात जे मोठ्या मोठ्या घोषणा करतात त्यांच्याशी आपण समोरासमोर येवून चर्चा करण्यास आमदार कैलास पाटील व मी तयार आहे. असे आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव घेवून दिले आहे.
शनिवार दि. 15 मार्च रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये उमरगाचे आमदार स्वामी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, एम्स च्या धर्तीवर धाराशिव येथील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी डिसेंबरमध्ये येण्याची केलेली घोषणा, तुळजापूर येथे न्यायालय उभारणे बाबत केलेली घोषणा, पीक विम्याबाबत शेतकऱ्यांनी 596 कोटी प्रिमियम भरला असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 250 कोटी मिळणे, धाराशिव येथील 500 बेडचे हॉस्पिटल 361 कोटी रूपयाचे अंदाज पत्रक आहे. असे असताना 2023-24 साली 1 हजार रूपये तरतूद व परत 24-25 च्या बजटमध्येही याच कामासाठी 1 हजार रूपये तरतूद करण्यात आली आहे. तर तुळजापूर येथील न्यायालयासाठी 31 कोटी रूपयाची तरतूद असताना बजटमध्ये 1 हजार रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी बजटमध्ये हजार रूपयाची तरतूद करता, मग मोठमोठ्या घोषणा कशाला करता? असा प्रश्न उपस्थित केले आहे. आमचे हे आरोप चुकीचे असतील तर आम्ही समोरासमोर येवून लाईव्ह चर्चा करण्यास तयार आहोत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हे आव्हान स्विकारावे असेही खासदार राजेनिंबाळकर यांनी सांगितले. यावेळी केंद्र सरकारने जे परिपत्रक काढले त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळत होती. परंतु केंद्र सरकारच्या या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना आता 25 टक्केच नुकसान भरपाई लागू आहे. सत्ताधारी आमदार लवकरच परिपत्रक रद्द होईल असे सांगतात. परंतु फक्त महाराष्ट्रात लागू झालेले हे परिपत्रक अद्यापही रद्द झाले नाही असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 350 हजार कोटीची आवश्यकता असताना सरकारने अल्प रक्कमेची तरतूद केली आहे.
लक्षवेधी सुचना
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणाबाबत बोलताना हा प्रश्न जिल्ह्यातील मुलांच्या भवितव्याशी निगडीत आहे. त्यामुळे आपण केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तारांकित प्रश्न टाकला आहे. अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. तर आमदार कैलास पाटील यांनी पण विधानसभा अध्यक्षांकडे लक्षवेधी सुचना मांडली आहे. असे सांगून आमदार कैलास पाटील यांनी हा काही राजकीय प्रश्न नाही तर सामाजिक प्रश्न आहे. गेल्या तीन वर्षापासून ड्रग्ज तस्कारांनी तुळजापूरमध्ये धुमाकूळ घातला आहे. असे आमदार पाटील म्हणाले.