धाराशिव (प्रतिनिधी)- निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना शून्य रुपये वीजबिल देऊन त्यात तिघांचे फोटो टाकले. निवडणुकानंतर त्याच शेतकऱ्यांना एक लाख बारा हजार रुपये वीजबिल देण्यात येतंय. शेतकऱ्यांना फसवून सरकारने त्यांचा तळतळाट घेऊ नये. असा हल्ला आमदार कैलास पाटील यांनी विधानसभा सभागृहात चढविला. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल यांच्या अभिभाषणावर बोलत होते.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, महापुरुषांच्या नावाने फक्त राजकारण होणं हे दुर्देवी आहे. महापुरुषांचा अपमान करण्याची हिंमत कुणी करणार नाही असे शासन करावे. हे करताना फक्त यामध्ये राजकारण करु नये असे मत मांडले. धाराशिव येथील कौडगाव एमआयडीसीमध्ये टेक्निकल टेक्सटाईल सुरु करण्याची घोषणा उद्योगमंत्री यांनी केली. पण त्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला नाही. हा प्रकल्प कधीपर्यंत सुरु होणार याची विचारणा आमदार पाटील यांनी केली. तसेच धाराशिव येथील एमआयडीसीमध्ये भूखंड घ्यायचा असेल तर त्याचा दर प्रति चौरस मीटरला एक हजार 650 रुपये इतका आहे. तर कुरकुंभ येथे हा दर अवघा साडेचारशे रुपये आहे. मग एवढा फरक असल्यावर कोणता उद्योग जिल्ह्यात येईल असा प्रश्न पाटील यांनी विचारला. हा दर कमी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. निवडणुकीच्या अगोदर सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणली. पण नंतर ही योजना बंद झाली. शिवाय दोन महिन्याचे वेतनही त्या युवाना मिळालेले नाही. ही योजना पूर्ववत सुरु ठेवून त्यांचे वेतन द्यावे. अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. शक्तिपीठ महामार्ग, मागेल त्याला सौरपंप, घरकूल योजना, पीककर्ज, सोयाबीन खरेदी आदीबाबत आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर टिका केली. 

 
Top