धाराशिव (प्रतिनिधी)-सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख  होण्यासाठी विधीनाट्य (गोंधळ, जागरण) शिबिराचे ना. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत आहे. सदर विधीनाट्य कार्यशाळा दिनांक 12 मार्च ते 22 मार्च 2025 या कालावधीत होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 20  प्रशिक्षणार्थीची निवड होणार आहे.

महाराष्ट्राच्या दैवत मंडळात प्रामुख्याने तीन संप्रदायातील देवता शैव, वैष्णव आणि शाक्त (स्त्रीदेवता) आढळून येतात. या देवतांशी संबंधित “जागरण व गोंधळ“ ही विधीनाट्य सादर होतात. या विधिनाट्यावर आधारित विविध घटना, पात्र, वाद्य यांच्या परिचय देणारे तसेच कला, रंगभूषा, वेशभूषा, गाणी  शब्द फेक, ध्वनीतील चढ उत्तार, सादरीकरण यावर हे शिबिर /कार्यशाळा आपल्या  जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे.

या कलेचे जतन व संवर्धन व्हावे य उद्देशाने शासनाचा स्तुत्य उपक्रम आपल्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. ही विधीनाट्य कार्यशाळा विनामूल्य आहे. सहभागी प्रशिक्षणार्थीना मानपत्र दिले जातील. सहभागी प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक यांना सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चवरे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाकरिता शुभेच्छा दिल्या आहे.

 
Top