धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' अर्थात 'मित्र' या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.राज्याची आर्थिक व धोरणात्मक दिशा ठरविणाऱ्या या महत्वपूर्ण संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरुवारी तसा शासन आदेश जारी करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील व नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
'मित्र' च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर सहअध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आहेत. या शासन निर्णयानुसार 'मित्र'द्वारे कृषी व त्यासोबत संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, शिक्षण, कौशल्य विकास व नावीन्यता, नागरिकरण व बांधकाम क्षेत्र विकास, भूमी प्रशासन, वित्त, पर्यटन, क्रीडा, ऊर्जा संक्रमण, वातावरणीय बदल, उद्योग, लघुउद्योग, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा व दळणवळण आदी विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून या क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले जाणार आहे. राज्याच्या विकासाला आर्थिक, धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारा विचार गट म्हणून मित्र या संस्थेकडे पाहिले जाते.
राज्याची सेवा करण्याची संधी
नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना आ.राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, राज्याचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करताना त्यातील मूळ उद्देश साध्य करण्याची मोठी जबाबदारी आहे. नीती आयोगाशी संलग्न अशी “मित्र“या संस्थेची कार्यपद्धती असून अशा महत्वाच्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मला राज्याची सेवा करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या नियुक्तीबद्दल या संस्थेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. मित्र संस्थेच्या झालेल्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्याचा विकास साध्य करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.