धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी दि. 8 जानेवारी रोजी धाराशिव येथील विविध कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी डॉ.ओम्बासे यांनी विविध कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाची कामाबाबत सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत येत्या 15 एप्रिल 2025 रोजी आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेतला जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ.ओंम्बासे यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांना, पशुसंर्वधन उपायुक्त कार्यालयास,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय,जिल्हा परिषदेतील सर्वच विभाग आणि नगर परिषदेला भेट दिली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश बारगजे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषेराव चव्हाण,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका,खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत.शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधनगृह कायम स्वच्छ राहतील याकडे लक्ष दयावे. असे निर्देश डॉ.ओंबासे यांनी दिले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील,त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करावा. अधिकारी नागरिकांसाठी कार्यालयात कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. 


 
Top