धाराशिव -
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने करण्यात येणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करून  अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या योजना पोहोचवाव्यात.असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. 


जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन समिती सभागृहात दिशा समितीच्या सभेत खासदार राजेनिंबाळकर बोलत होते.आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. खासदार राजेनिंबाळकर पुढे म्हणाले, शेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचा परतावा देताना टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. सर्वसामान्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवावी. अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग कामाबाबत कोणताही हजगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे ते म्हणाले.या समितीच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून अशा अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव पाठवावा.असे त्यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कांचनमाला संगवे,रणजित पाटील व सिध्दार्थ बनसोडे तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 
Top