धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 15 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी अवलंब करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतांना फक्त 5 व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.

निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात  वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, मोटारसायकल, वाहने यांचा समावेश नसावा. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात फक्त पाच व्यक्ती उपस्थित राहतील. याव्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या (फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  देण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन त्यांनी हा आदेश निर्गमित केला आहे.हा आदेश 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.


 
Top